ब्रह्मपुरी : देलनवाडी येथील ८ व्या क्रमांकाच्या केंद्रांवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सकाळी ९:३० वाजता सहकुटुंब दाखल झाले. दरम्यान, मतदान केल्यानंतर स्लिप कटून खाली पडते. पण, त्यावेळी लाइट डार्क होतो. त्यामुळे मत कुणाला पहले हे ओळखता येत नाही', अशी तक्रार काहींनी वडेट्टीवारांकडे केली, 'स्वतः मतदान करतो आणि त्यानंतर सांगतो', असे आश्वस्त करून केंद्रात गेले. मतदानानंतर वडेट्टीवारांनीही उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांच्याकडे आक्षेप नोंदविला. 'मतदान केल्यानंतर जेव्हा लाइट ऑफ होतो तेव्हा मतदान झाले आहे. केवळ स्लिप कट होताना दिसत नाही, असे स्पष्टीकरण उपविभागीय अधिकारी भस्के यांनी दिल्यानंतर वडेट्टीवारांचे समाधान झाले. नंतर आक्षेपाचे कारण नसल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले.
यंत्रांतील बिघाड; मतदार ताटकळले
काही केंद्रांवर ईव्हीएम यंत्रांत अचानक बिघाड झाल्याने उशिरा मतदान सुरू झाले. जिवती तालुक्यातील येल्लारपूर केंद्रात तयारी पूर्ण झाल्यानंतरही यंत्र इनव्हॅलिड दाखविल्याने सकाळी ८ पर्यंत मतदार ताटकळले होते. ८:२० वाजेपासून मतदान सुरू झाले. चिमूर तालुक्यातील पळसगाव केंद्रात सकाळी ७:२० वाजता यंत्र बंद पडले. यंत्र बदलल्यानंतर मतदानाला सुरुवात झाली.
चर्चा तामिळनाडूच्या जवानांची
चिमूर तालुक्यातील शंकरपूर केंद्रात तामिळनाडूतील २५ सीआरपीएफ बंदूकधारी जवानांची तुकडी तैनात करण्यात आली. आतापर्यंतच्या निवडणुकांत येथील केंद्रावर सीआरपीएफ जवान तैनात झाले नव्हते. पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू व ठाणेदार तुषार चव्हाण यांनी वासेरा येथील केंद्राला भेट दिली.
मिळाले नाही पिण्याचे पाणी
भारी जि. प. शाळेतील केंद्रात पाण्याची व्यवस्था न केल्याने मतदारांना समस्याचा सामना करावा लागला. दीड हजारांपेक्षा अधिक मतदार असतानाच एकच केंद्र ठेवल्याने ज्येष्ठ मतदारांची मोठी गैरसोय झाली. राजुरा, रामपूर येथे उन्हात उभे राहावे लागले.
शाळा बांधकामाने घोसरीत खोळंबा
घोसरी येथे प्रत्येक निवडणुकीत दोन केंद्रे दिली जातात. पण, जि.प. शाळेचे बांधकाम सुरु असल्याने यावेळी एकच मतदान केंद्र देण्यात आले. या केंद्रावर १ हजार ३४७ मतदार आहेत. उन्हाची तीव्रता वाढण्यापूर्वीच मतदान करता यावे म्हणून गर्दी झाली. मात्र, एकच केंद्र असल्याने मतदारांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले.
काँग्रेसची नवी खेळी : चंद्रपूरच्या उमेदवारीवरून दिल्लीत खलबते
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनाच मैदानात उतरविणार असल्याची चर्चा जिल्ह्यात आली. काही वेळानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे नाव पुढे आले. काँग्रेस नेमकी धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करते वा वडेट्टीवारांना मैदानात उतरवून नवी खेळी करते, याकडे लक्ष लागले आहे. अधिकृत घोषणेकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
चंद्रपुरात भाजपने सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपाने दमदार उमेदवार रिंगणात उतरविला आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालते, यावरून खलबते सुरू होती. एकीकडे आमदार प्रतिभा धानोरकर तर दुसरीकडे नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. चंद्रपुरात सुरू झालेला उमेदवारीचा तिढा मुंबईमार्गे दिल्लीत पोहोचला. मागील काही दिवसांपासून
धानोरकर आणि वडेट्टीवार गट दिल्लीत ठाण मांडून आहे. दोन्ही गट आपापल्या दावेदारीवर ठाम असल्याने काँग्रेसला ही उमेदवारी जाहीर करताना संभाव्य धोके विचारात घेणे गरजेचे असल्याची चर्चा होती. अखेर बुधवारी दिल्लीत हायकमांडने आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याची वार्ता चंद्रपुरात पोहोचली. मात्र, काही वेळातच शिवानी वडेट्टीवार याचे नाव मागे पडून त्याऐवजी विजय वडेट्टीवार यांचे नाव अचानक पुढे आल्याने नवीन समीकरणे पुढे येण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. वडेट्टीवारांना उमेदवारी मिळाली तर दोन वारांमध्ये लोकसभेचा महासंग्राम होईल, असे दिसते.